अर्थमंत्र्यांचे ATM, UPI आणि Cash संदर्भात महत्वाचे निर्देश   

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी बँकिंग आणि विमा क्षेत्रातील उच्च अधिकाऱ्यांसोबत आणि वित्तीय क्षेत्राच्या नियामकांशी बैठक घेतली. अर्थमंत्र्यांनी सायबर सुरक्षा प्रणाली मजबूत करण्याचे आणि डेटा सेंटर्सचे नियमितपणे ऑडिट करण्याचे निर्देश दिले जेणेकरून सर्व डिजिटल आणि कोअर बँकिंग पायाभूत सुविधांचे फायरवॉल पूर्णपणे सुनिश्चित होईल.
 
याशिवाय अर्थमंत्र्यांनी कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या सायबर क्रियाकल्प आणि उल्लंघनाला प्रतिबंध करण्यासाठी त्यांच्यावर २४ तास पाळत ठेवण्यास सांगितले. बँका आणि विमा कंपन्यांव्यतिरिक्त वित्तीय सेवा विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), IRDAI आणि NPCI यांचे वरिष्ठ अधिकारी देखील बैठकीला उपस्थित होते.

भारत-पाकिस्तान तणावात अर्थमंत्र्यांचे निर्देश

सीतारमन यांनी  शुक्रवारी, ९ मे रोजी बँकांना सतर्क राहण्यास आणि ग्राहकांना सुरळीत सेवा सुनिश्चित करण्यास सांगितले. देशवासियांना कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी सर्व पावले उचलावी, असे त्यांनी निर्देशही दिले. सायबर सुरक्षा तयारी बाबत बँका आणि विमा कंपन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांच्या बैठकीत अर्थमंत्र्यांनी आव्हानात्मक काळात आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यात बँकिंग आणि वित्तीय क्षेत्राच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला.

सायबर सुरक्षा आणि आपत्कालीन प्रोटोकॉलवर भर

बँकिंग सेवा - बँक शाखा आणि डिजिटल बँका - कोणत्याही व्यत्ययाशिवाय आणि अडचणींशिवाय सुरू राहिल्या पाहिजेत. तसेच कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी बँकांनी आपत्कालीन प्रोटोकॉल अपग्रेड करावे आणि त्यांची चाचणी घेण्याचे आदेशही अर्थमंत्र्यांनी या बैठकीत दिले. त्याचवेळी, सीमावर्ती भागातील शाखांमध्ये काम करणाऱ्या बँक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देशही अर्थमंत्र्यांनी दिले.

पुरेसा कॅश उपलब्ध करण्याचे आदेश

सामान्य नागरिक आणि व्यवसायांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, याची खात्री करण्याचे बँकांना सांगितले. ATM मध्ये पुरेशी रोकड, बिनदिक्कत UPI आणि इंटरनेट बँकिंग सेवा व इतर आवश्यक बँकिंग सुविधांची उपलब्धता प्रत्येकाची प्राथमिकता असली पाहिजे, असे अर्थमंत्र्यांनी नमूद केले.
 

Related Articles